सर्व यंत्रणांना महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांचे निर्देश
कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याची छायाचित्रे व्हॉट्सअपवर पाठविण्याच्याही सूचना
पावसाळापूर्व तयारीच्या दृष्टीने डास निर्मूलन समितीची सभा संपन्न
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व शासकीय, निम-शासकीय यंत्रणांनी आपापल्या अखत्यारितील कार्यालये व परिसरांमध्ये पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक (Mosquito Proof) करणे, निकामी-भंगार साहित्याची विल्हेवाट लावणे इत्यादी सर्व कामे दिनांक ३० एप्रिल २०२२ पूर्वी पूर्ण करावीत. तसेच कोठेही पाणी साचून डासांची उत्पत्ती होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. कार्यवाही पूर्ण झालेल्या कामांची छायाचित्रे व्हॉट्सअप समुहामध्ये पाठविण्याची सूचना देखील याप्रसंगी आयुक्तांनी केली.
येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये हिवताप (मलेरिया), डेंगी व तत्सम आजारांना प्रतिबंध म्हणून महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व कीटकनाशक विभागाने नियमित उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठीच्या डास निर्मूलन समितीची (Mosquito Abatement Committee) सभा समितीचे अध्यक्ष तथा महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच (दिनांक २१ मार्च २०२२) दुपारी झाली. त्याप्रसंगी सदस्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
या सभेस बेस्टचे महाव्यवस्थापक श्री. लोकेश चंद्र, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्री. सुरेश काकाणी, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. संजय कुऱहाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे, कीटकनाशक अधिकारी श्री. राजन नारिंग्रेकर यांच्यासह राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्ट, लष्कर, नौदल, वायूदल, सैन्यदल अभियांत्रिकी सेवा, बेस्ट, डाक विभाग, एमटीएनएल, बीएसएनएल, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. अशा शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे मिळून ५१ प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
प्रारंभी, महानगरपालिकेचे कीटकनाशक अधिकारी श्री. राजन नारिंग्रेकर यांनी सर्व शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणांच्या हद्दीतील मालमत्तांसह कार्यालय परिसरांमधील पाणी साठवण्याच्या टाक्या, शासकीय परिसरांमध्ये असलेले निकामी, निकृष्ट व भंगार साहित्याची ठिकाणे याबाबत केलेल्या सर्वेक्षणाची सांख्यिकी सादर केली. तसेच छायाचित्रांसह संगणकीय सादरीकरण देखील केले. ज्या-ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या अद्याप डास प्रतिबंधक करण्यात आलेल्या नाहीत, त्याबाबतची योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना या यंत्रणांना करण्यात आल्याचे श्री. नारिंग्रेकर यांनी नमूद केले. तसेच पाणी साचून डासांची उत्पत्ती होवू नये, यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना दरवर्षी कशा केल्या जातात, त्याची माहितीही त्यांनी दिली.
यानंतर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) श्री. सुरेश काकाणी यांनी प्रत्येक यंत्रणानिहाय कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी पाणी साठवण्याच्या टाक्यांचे डास प्रतिबंधन करणे आवश्यक आहे. पाण्याच्या टाक्यांची गळती रोखणे, टाक्यांना झाकण किंवा आच्छादन लावणे, कोठेही निकामी साहित्य व भंगार पडलेले असल्यास तेथे पाणी साचू न देणे, अशा साहित्याची योग्यरित्या विल्हेवाट लावणे आवश्यक आहे, अशी सूचना त्यांनी केली.
कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) मंगला गोमारे यांनी मुंबई महानगरामध्ये मागील काही वर्षांमध्ये हिवताप व डेंगी तसेच तत्सम आजार रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. या आजारांना रोखण्यासाठी नागरिकांसमवेतच सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणांचे सहकार्य आवश्यक असून मुख्यत्वाने डासांची उत्पत्ती रोखणे, हा मूळ उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी सविस्तर चर्चेनंतर सर्व यंत्रणांना विविध निर्देश दिले. त्यांनी सांगितले की, ज्या यंत्रणांच्या हद्दीत पाणी साठवण्याच्या जागा व टाक्या यांचे डास प्रतिबंधन शिल्लक आहे, निकामी व भंगार साहित्याची विल्हेवाट लावलेली नाही, त्यांनी त्वरेने कार्यवाही सुरु करावी. दिनांक ३० एप्रिल २०२२ पर्यंत सर्व कार्यवाही पूर्ण करुन महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. संबंधितांनी ही कार्यवाही पूर्ण केल्यानंतर त्याची छायाचित्रे व्हॉट्सअप समुहामध्ये पाठविणे आवश्यक असेल. महानगरपालिका कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. कार्यवाही पूर्ण झाली आहे किंवा कसे, याबाबतचा आढावा घेण्यासाठी समितीची सभा पुन्हा घेण्यात येईल, असेही आयुक्त डॉ. चहल यांनी नमूद केले.
महत्त्वाची व वैशिष्ट्यपूर्ण माहिती
• डासांचे आयुष्य हे साधारणपणे तीन ते सहा आठवड्यांचे असते. या आयुष्यात डासाची मादी साधारणपणे तीन वेळा अंडी घालते. प्रत्येक वेळी साधारणपणे ८० ते १०० अंडी घातली जातात. ही अंडी शुष्क अवस्थेतही साधारणपणे वर्षभरापर्यंत राहू शकतात. त्यानंतर जेव्हा पाण्याशी संपर्क येईल, तेव्हा ही अंडी फलित होऊ शकतात.
• मलेरिया व डेंगी पसरविणाऱया डासाची मादी ही आपली अंडी स्वच्छ व साचलेल्या पाण्यातच घालते. ही अंडी घालण्यासाठी चमचाभर साचलेले पाणी देखील पुरेसे असते. अंडी घातल्यापासून साधारणपणे आठवड्याभरात डासांची उत्पत्ती होते.
• फुलांचे परागकण, फळे वा इतर शर्करा असणारे पदार्थ हे नर डासांचे प्रमुख अन्न मानले जाते. तर रक्त हे मादी डासांचे अन्न असते व त्यामधील प्रथिनांची अंडी तयार होण्याकरिता आवश्यकता असते. या प्रथिनांसाठी डासाची मादी मानवाला चावते.
• मलेरिया, डेंगी यासारख्या रोगांचे परजीवी/विषाणू हे डासांच्या शरीरात असू शकतात. परजीवी/विषाणू वाहक असणारी डासाची मादी मानवाला चावल्यास त्या रोगांचे मानवात संक्रमण होते. डेंगीचे संक्रमण करणारी डासाची मादी ही मानवाला साधारणपणे दिवसा चावते, तर मलेरियाचे संक्रमण करणारी डासाची मादी ही बहुतांशी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान चावते.
• डास चावू नये यासाठी मच्छरदाणीचा वापर करणे, मलम वापरणे, शरीर अधिकधिक झाकले जाईल असे कपडे वापरण्यासारख्या बाबींचा अवलंब करावा. तसेच महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खाते व कीटक नियंत्रण खात्याद्वारे वेळोवेळी दिल्या जाणाऱया सूचनांचे कसोशीने पालन करावे.
जसंवि/६३०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा