वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने सी विभागात महानगरपालिकेची कारवाई
मुंबई, दि. १ : मुंबईतील सी विभागात नागरी वस्तीत असलेल्या सोने-चांदी गलाई व्यावसायिकांच्या बारा भट्टी, धुराडे निष्कासित करण्याची कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. वायू प्रदूषणास कारणीभूत ठरत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई
महानगरपालिका प्रशासनाकडून मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार
महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरु आहे. महानगरपालिका आयुक्त तथा
प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका
आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम
उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व २४
प्रशासकीय विभागांमध्ये उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे. त्यासोबतच व्यापक
आरोग्य हित लक्षात घेता, वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणा-या इतर घटकांवरही महानगरपालिका प्रशासनाकडून
कठोर कारवाई केली जात आहे.
नागरी वस्तीत सोने चांदी वितळवणा-या भट्टींवर (गलाई व्यवसाय) आणि आम्ल भट्टींवर (ऍसिड फर्नेस) महानगरपालिकेच्या सी विभाग कार्यालय अंतर्गत इमारत व कारखाने विभागाने सक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. काल (दिनांक २९ फेब्रुवारी २०२४) सी विभागातील पटवा चाळ आणि तेली गल्ली येथील सोने-चांदी वितळवणाऱया अर्थात गलाई व्यावसायिकांचे एकूण १२ धुराडे (चिमणी) निष्कासित करण्यात आले आहेत. अशा प्रकारची कार्यवाही यापुढे देखील सुरू राहणार आहे, अशी माहिती सी विभागाचे सहायक आयुक्त श्री. उद्धव चंदनशिवे यांनी दिली.
सोने-चांदी गलाई व्यवसायात सोने-चांदी वितळवण्यात येते. त्यासाठी छोटेखानी
स्वरुपाचा कारखाना असतो. यामध्ये सोने-चांदी वितळवण्यासाठी भट्टीचा वापर केला
जातो. त्यातून निर्माण होणारे आम्ल आणि वायू आदी चिमणी / धुराडे याद्वारे हवेत
सोडले जातात. शास्त्रीय प्रक्रिया न करता सोडण्यात आलेल्या वायूमुळे मानवी
आरोग्याला धोका पोहोचतो. या घातक वायूमुळे प्रदूषणात भर पडत असल्याने बृहन्मुंबई
महानगरपालिकेने वायू प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱया गलाई व्यावसायिकांविरोधात
सक्त कारवाई केली आहे. या अंतर्गत बारा भट्टी, धुराडे यांचे निष्कासन करण्यात आले.
(जसंवि/६६५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा