१० जुलै २०२३
मुंबई, दादासाहेब येंधे : वडाळा पोलिस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी ३० वर्षांपासून गुंगारा देत होता. शोध मोहिमेत हा आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत होती. नेमके काही केळत नसल्याने पोलिसांनी शक्कल लढवली. आरोपीच्या उत्तर प्रदेश येथील घराच्या पत्त्यावर काही रक्कम मनीऑर्डरने पाठविले. पैसे घेण्यासाठी आरोपी आल्याने जिवंत असल्याची खात्री पटली आणि अखेर ३० वर्षांनी पोलिसांनी आरोपीला कल्याण येथून शोधून काढले.
वडाळा पोलिस ठाण्यात १९९३ मध्ये दाखल असलेल्या हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यामध्ये दशरथ राजभर याला पोलिसांनी अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर न्यायालयात खटल्याच्या तारखांना दशरथ उपस्थित राहत नव्हता. अनेक वर्षे गैरहजर राहिल्याने न्यायालयाने त्याला फरार घोषित केले. अनेकांनी तपासादरम्यान दशरथ याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तपास बंद करण्यापूर्वी पोलिसांनी आणखी एक डाव टाकला आणि दशरथ याच्या उत्तर प्रदेशातील पत्त्यावर एक मनी ऑर्डर पाठवली. दशरथ हा घरी येऊन पैसे घेऊन गेल्याचे समजले.
पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील दशरथचे घर गाठले. मात्र त्याआधीच तो गायब झाला होता. तो जिवंत असल्याचे कळल्यावर पोलिसांनी अधिक खोलवर जाऊन त्याचा शोध सुरू केला. दशरथ हा कल्याण येथे राहत असल्याचे समजले आणि पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात तो अलगद अडकला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा