परपुरुषाशी संबंध असल्याचा संशयातून हत्या
मुंबई, दादासाहेब येंधे : प्रेयसीच्या चारित्र्याचा संशय आला आणि त्याने तिची हत्या करून तिच्या मृतदेह सुटकेसमध्ये भरला. ती सुटकेस घेऊन तो मुंबईत दीड तास फिरत राहिला. या घटनेचा छडा लावण्यात वडाळा पोलिसांना यश आले असून प्रियकर ऑस्कर मनोज बरला (वय, २२) याला गुन्हे शाखेने अटक केली आहे.

कुर्ला येथे मेट्रो रेल्वेच्या बांधकामाजवळ रविवारी एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्याने खळबळ उडाली होती. कुर्ला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी स्मानते तपास सुरू केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या कक्ष-५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर व कक्ष -११ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आठ तपास पथके तयार करण्यात आली होती. तरुणीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. तरुणीचा प्रियकर गावी ओरिसाला पळून जाण्याच्या तयारीत असतानाची माहिती मिळताच पोलीस पथकाने ठाणे रेल्वे स्थानकातून त्याला अटक केली.
प्रतिमा पवन किस पट्टा (वय, २५) असे मृत मुलीचे नाव असून ती मूळची ओडीसा येथील रहिवासी असून सध्या ती धारावीत राहत होती. ती आरोपी बरला सोबत २०२१ पासून लिव्ह-इन-रिलेशनशिप मध्ये राहत होती. चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये खटके उडायचे. शनिवारी रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास दोघांमधील वाद टोकाला पोहोचला आणि बरला याने तिची गळा दाबून हत्या केली.
लॉकडाऊन दरम्यान ओळख आणि प्रेम...
लॉकडाऊन दरम्यान कामगारांनी गावची वाट धरली होती. भरतीच्या रेल्वे प्रवासादरम्यान २०२० मध्ये प्रतिमाची अस्कर सोबत ओळख झाली होती. दोघे एकाच गावातील निघाल्याने त्यांच्यात संवाद आणि जवळीक वाढली होती. लॉकडाऊननंतर पुन्हा मुंबईत येताना दोघांची भेट झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रतिमा पवन किसपट्टा (वय, २५) ही मुंबईत मोलकरणीचे काम करत होती. तर अख्तर हा सुरुवातीला बेंगलोर मध्ये नोकरीला होता.
प्रतिमा ही धारावीत भाड्याने राहण्यास होती. महिनाभरापूर्वी तिने अस्कर याला बेंगळूर वरून मुंबईत बोलावले होते. पंधरा दिवसांपूर्वी तो मिठाईच्या दुकानात नोकरीला लागला होता. पण, प्रतिमा त्याचे ऐकत नव्हती. ती मित्रांसोबत चॅटिंग करत असल्याने त्याने तिच्यावर संशय घेत तिची हत्या केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
तरुणीच्या गळ्यातील क्रॉस आणि अंगावरील कपड्यांवरून ती ख्रिश्चन तसेच मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याचा अंदाज पोलीस पथकाला आला. हत्येच्या चार ते पाच तासातच मृतदेह फेकल्याचे समजल्याने जवळपासच गुन्हे शाखेने तपास सुरू केला. ती धारावीत राहत असल्याचे समोर आले.
मृतदेह भरलेली बॅग घेऊन तो पायी सायन सर्कल येथे आला. तिथून सव्वा सातच्या सुमारास त्याने रिक्षा पकडली. रिक्षाने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे गेला. मात्र, तेथे गर्दी बघून भीती वाटल्याने त्याने दुसरी रिक्षा पकडली. मात्र, ती सायनच्या दिशेने निघाली. रिक्षा दुसऱ्या दिशेने जात असल्याने त्याने रिक्षामध्येच थांबवली. दीड तासांच्या प्रवासानंतर तो कुर्ला येथील मेट्रो रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी आला. तेथे अंधार असल्याचे पाहून तिथेच मृतदेह असलेली बॅग फेकून तो रिक्षाने घरी परतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा