राज्यभरात कारवाईची मोहीम हाती घेण्याचे फर्मान
मुंबई : बाईकवरून प्रवास करताना प्रत्येकाला हेल्मेट सक्तीचं करण्यात आले आहे. पण, हेल्मेटला वेळोवेळी विरोध झाला आहे. हेल्मेट किती महत्त्वाचे आहे हे प्रत्येकवेळी घडणाऱ्या अपघातांवरून दिसून येते. हा कायदा सर्वसामान्यांसाठीच नव्हे तर शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनाही तो लागू आहे. त्यांच्यावरही आता परिवहन विभागाने दंडुका उगारला आहे. विनाहेल्मेट कार्यालयात जाणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे लक्ष केंद्रित करीत, कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत.
यासंदर्भातील पत्र राज्य परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी नुकतेच राज्यातील सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना तातडीने ईमेल केले आहे. 'शासकीय कार्यालया'ला उद्देशूनच दुचाकीने विनाहेल्मेट येणाऱ्यांवर कारवाई करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
नागरिक हेल्मेटशिवायच प्रवास करत असल्याचे अपघातांच्या विविध घटनांवरून समोर येते. त्याचा दाखला देत परिवहन आयुक्तांनी राज्यभरात कारवाईची मोहीम हाती घेण्याचे फर्मान सोडले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा