शिकारी' अखेर पोलिसांच्या जाळयात अडकलाच - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

शुक्रवार, ३० ऑगस्ट, २०२४

शिकारी' अखेर पोलिसांच्या जाळयात अडकलाच

मुंबई पोलिसांनी ९ राज्ये पालथी घालून दिल्लीतून त्याला पकडले


मुंबई, दि. ३० : वडाळ्यात राहणाऱ्या १२ वर्षाच्या मुलाची निर्घृणपणे हत्या करून पळून गेलेल्या बिपुल शिकारी हा सहा महिन्यांनी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या मदतीने बिपुल शिकारीला दिल्लीच्या ‘रेड लाईट’ परिसरातून अटक केली आहे.


बिपुल शिकारीला एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती, तुरुंगातून संचित रजेवर आल्यानंतर शिकारी याने मुंबईतील वडाळा येथे १२ वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह खाडीनजीक फेकला होता. संशयित शिकारीला स्थानिकांनी पकडून चोप देत वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांच्या ताब्यात दिले होते, पोलिस ठाण्यातून त्याने पळ काढला होता. त्यानंतर शिकारीला जंगजंग पछाडले असता अखेर दिल्ली येथून त्याला अटक करण्यात आली आहे.


वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २८ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या १२ वर्षाच्या मुलाचा पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह ३५ दिवसांनी वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्व मुक्त मार्ग पुलाजवळील एका खाडीजवळ मिळून आला होता. मारेकऱ्याने मुलाची हत्या करून त्याचे मुंडके धडावेगळे करण्यात आलेले आहे. वडाळा टीटी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालय येथे पाठविण्यात आला असून हत्येपूर्वी मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. बळीत मुलगा हा ज्या दिवशी बेपत्ता झाला त्या दिवशी त्याला शेजारी राहणाऱ्या बिपुल शिकारी यांच्यासोबत शेवटचे लोकांनी बघितले होते, या संशयावरून स्थानिकांनी शिकारीला पकडले होते, त्याला चोप देत वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. 


स्थानिकांच्या मारहाणीत जखमी झालेल्या बिपुल शिकारीला ठाणे अंमलदार यांनी तोंड धुण्यासाठी पाठवले असता शिकारीने पोलीस ठाण्यातून पळ काढला होता. २८ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या १२ वर्षाचा मुलाचा मृतदेह ४ मार्च रोजी बेपत्ता मुलाचा मृतदेह वडाळा येथील खाडीत कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. २८ जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या मुलाची बिपुल शिकारीने हत्या केल्याचे तपासात समोर आले, मात्र शिकारी हा पोलिसांच्या तावडीतून मृतदेह मिळण्याच्या अगोदर पळून गेला होता. वडाळा टीटी पोलीस ठाण्यातुन पळून गेलेला संशयित आरोपी बिपुल शिकारी हा पळून गेल्यामुळे पोलिसांना त्याच्यावरील अधिक संशय बळावला, पोलिसांनी बिपुलची माहिती काढली असता बिपुल हा कोलकत्ता राज्यात राहणारा असल्याचे कळताच वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे पथक कोलकत्ता येथे त्याच्या शोधासाठी रवाना झाले. 


दरम्यान एक धक्कादायक बातमी शोध पथकाला कळली. बिपुल याच्यावर कोलकत्ता येथे २०१४ मध्ये एका हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झाली होती, कोविडमध्ये तो पॅरोलवर बाहेर पडला होता अशी माहिती पोलिसांच्या हाती लागली. शोध पथक बिपुलचा शोध घेत उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मीर पर्यंत मुंबई पोलिसांच्या पथकाने त्याचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही. शिकारी बेपत्ता झाल्याचा तांत्रिक तपास करण्यात आला, त्यादरम्यान गुन्हेगार दिल्लीला पळून गेल्याचा संशय मुंबई पोलिसांना होता. तो बसमध्ये चढताना दिसला. तो नक्कीच संपर्क करेल या आशेने पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांचे फोन ट्रेस केले. पोलिसांची ही युक्ती कामी आली. दिल्लीला जाताना शिकारीने आईला फोन करण्यासाठी दुसऱ्या प्रवाशाचा फोन वापरला. मुंबई पोलिसांनी दिल्ली आणि शेजारील राज्यांतील आपल्या टीमला सतर्क केले. मध्य दिल्लीतील जीबी रोडवर गुरुवारी पहाटे बिपुल शिकारी आल्याची खबर पोलिसांना मिळताच ते साध्या गणवेशात तेथे पोहोचले. दिल्लीचे पोलीस उपायुक्त हर्षवर्धन आणि सचिन शर्मा यांना याबाबत माहिती देण्यात आली. शिकारी हा दिल्लीच्या कुंटणखान्यात (रेड लाईट एरिया) शिरला आणि ३० मिनिटांनी बाहेर येताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पोलीस आपल्या मागावर असल्याचे बघून तो धावू लागला, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अखेर त्याला ताब्यात घेण्यात आले. मुंबई पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली आहे. त्याचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक पथक शुक्रवारी दिल्लीत पोहोचले, बिपुलला अटक करून ट्रँझिस्ट रिमांड घेऊन पोलीस आरोपी शिकारीला घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज