एलोरा गेस्ट हाऊसमधून ६ जणांना अटक
मुंबई, दि. ९ : दरोडाच्या तयारीत मुंबईत आलेल्या दिल्लीतील सहा जणांच्या टोळीला राज्य दहशतवादी विरोधी पथकाच्या (एटीएस) जुहू युनिटने अटक केली आहे. बोरवली रेल्वे स्टेशन जवळील एलोरा गेस्ट हाऊस मधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून तीन पिस्तूल आणि २९ काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.
एटीएसने दिलेल्या माहितीनुसार एलोरा गेस्ट हाऊस मध्ये गेल्या दोन दिवसांपासून परराज्यातील सहाजण राहत असून त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने रविवारी सापळा रचून सहाजण निघण्याच्या तयारी असताना त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा, एक देशी बनावटीची पिस्टल, एक विदेशी बनावटीची पिस्टल, चार मॅक्झिन, २९ राऊंडसह, चाकू तसेच स्कॉर्पिओ गाडी व दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या मदतीने ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत हत्येच्या गुन्ह्यात शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर आलेला शहादत हुसेन उर्फ कल्लू रहमत हुसेन (जामा मज्जिद), गाजियाबाद मध्ये हत्या तसेच सोनसाखळी आणि शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या अस्लम शब्बीरअली खान, दरोडेखोर नदीम युनूस अन्सारी, चोरीचे गुन्हे नोंद असलेला रिझवान अब्दुल लतीफ यांच्यासह नौशाद अन्वर आणि आदिल खान यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये नौशाद हा मुंबईत रेकी करण्याच्या उद्देशाने मुंबईत आला होता. तर आदिलही त्यात सहभागी होण्यासाठी आला असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
0 टिप्पण्या