Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२२ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारे नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारे, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या, संपूर्ण कोरोनामुक्तीच्या वाटेवर घेऊन जाणारे ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मावळते २०२१ वर्ष अनेक संकटांना, आव्हानांना घेऊन आले. मात्र, महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण या आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. राज्य आणि देशासमोर ओमायक्रॉनचा धोका आणि कोरोनारुग्णांची वाढती संख्या हे नवीन आव्हान नववर्षाच्या सुरुवातीलाच उभे राहिले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून आपण या संकटावर लवकरच विजय मिळवू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

कृषी, उद्योग व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचे हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊया, असे सांगतानाच  नववर्षाचे स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यभान राखत संयमाने करा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या