मुंबई, (दादासाहेब येंधे) : गांजाची तस्करी प्रकरणात अमली पदार्थ विरोधी कक्षाने रंगेहाथ पकडलेल्या दोघा आरोपींना विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला. त्या दोघांविरोधात पोलिसांनी सादर केलेल्या योग्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोघांनाही १५ वर्ष सक्त मजुरी व दीड लाख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
२०११ साली अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या कांदिवली युनिटने घाटकोपर-अंधेरी लिंक रोड येथे इस्माईल शेख आणि इमरान अन्सारी अशा दोघांना होंडा अॅकार्ड कारमधून गांजाची तस्करी करताना रंगेहाथ पकडले होते. तेव्हा कारमध्ये लपवलेला २८ लाख ७५ हजार किंमतीचा १५५ किलो गांजा व एक कार असा एकूण ३३ लाख ७५ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी आणखी दोघांना पकडले होते.
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी विशेष सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. कांदिवली युनिटचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत जगदाळे, निरीक्षक रुपेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संजय खंडागळे व पथकाने आरोपींविरोधात सबळ पुरावे सादर केले. त्या आधारे न्यायालयाने इस्माईल व इमरान या दोघांना १५ वर्षे सक्त मजुरी व दीड लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.![]()
0 टिप्पण्या