Ticker

6/recent/ticker-posts

भक्तांच्या हाकेला धावणारी देवी अशी ख्याती, ७० वर्षांपासून विसर्जनही केले जात नाही

मुंबई, दि. २६ : सध्या देशभरात नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. मुंबईतही अनेक ठिकाणी नवरात्रीच्या निमित्ताने उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुंबईतील रंगारी बदक चाळ, काळाचौकी येथील समर्थ हनुमान मंडळातर्फे दरवर्षी नवरात्रौत्सवात मोठया उत्साहा साजरा करण्यात येतो. भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून या देवीची महाराष्ट्रभर ख्याती आहे. गेल्या ७० वर्षांपासून या देवीची मातीची मूर्ती असून देवीचे विसर्जन करण्यात आलेले  नाही. 

रंगारी बदक चाळ, काळाचौकी येथील समर्थ हनुमान मंडळातर्फे १९५० साली जागृत देवी मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. ज्यावर्षी देवीची स्थापना करण्यात आली, त्यावर्षी या देवीला विसर्जनासाठी घेऊन निघाले होते, त्यावेळी ही मूर्ती जागेवरून हलत नव्हती. याचवेळी मंडळाचे दहा कार्यकर्ते देवीला उचलण्याचा प्रयत्न करत होते, तरीही देवीची मूर्ती जागेवरून हलत नव्हती.

त्यावेळी मंडळाच्या एका कार्यकर्त्याच्या अंगात देवीचे रुप आले आणि यावेळी देवीने म्हटले की, माझे विसर्जन करू नका, माझी स्थापना इथेच करा. तेव्हापासून आतापर्यंत देवीचे विसर्जन केले जात नाही. वर्षाचे ३६५ दिवस देवी इथेच असते. इथेच देवीचे मंदिर बांधण्यात आले आहे.


दरवर्षी इथे मोठ्या उत्साहात नवरात्री साजरी केली जाते. गुजराती, मराठी, बंगाली असे सर्व भाषिक मंडळी या देवीला साकडे  घालण्यासाठी नवरात्रौत्सवात गर्दी करताना दिसतात. अशी माहिती मंडळाचे प्रसिद्धिप्रमुख दादासाहेब येंधे यांनी दिली आहे. तसेच या कालावधीत महिलांकडूनही मोठया प्रमाणात देवीच्या नावाचा जप (नामस्मरण) केला जातो. भक्तांच्या हाकेला धावणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या