प्रत्येक प्रकल्प राबवताना आता 'पर्यावरण संरक्षण' हा निकष समाविष्ट करणे आवश्यक
विकास आणि शाश्वत विकास यातील अंतर समजून घेणे आवश्यक असून यापुढे प्रत्येक प्रकल्प राबवताना पर्यावरण संरक्षण व संवर्धन निकष लक्षात ठेवून त्यांची अंमलबजावणी करावी लागेल. जगातील अनेक देशांमध्ये वातावरण बदलामुळे पूरस्थिती, चक्रीवादळे यासारख्या नैसर्गिक समस्या उभ्या झाल्या आहेत. मुंबईलाही त्याचा सामना करावा लागतो आहे. वातावरणीय बदलामुळे उद्भवणाऱया समस्यांवर राजकीय संवेदनशीलता निर्माण होणे गरजेचे आहे, असे सांगून प्रत्येक महिन्यात यादृष्टिकोनातून विकासकामांचा आढावा देखील घेतला पाहिजे, असे उद्गार राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काढले.
प्रामुख्याने हवामानातील बदल, भौगोलिक व इतर कारणांनी मुंबई महानगराला पावसाळ्यात अतिवृष्टीप्रसंगी पूरस्थितीचा सामना करावा लागतो. या अनुषंगाने मुंबईतील पूर जोखीम, वेगवेगळ्या घटकांवर त्याचे होणारे परिणाम व संभाव्य उपाययोजना याविषयी विचारविनिमय आणि मार्गदर्शन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया या संस्थेच्या सहकार्याने सह्याद्री राज्य अतिथीगृह (वाळकेश्वर) येथे आज (२८ एप्रिल २०२२) पासून दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचा शुभारंभ पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्यासह उपआयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले, उपायुक्त (पर्यावरण) श्री. सुनील गोडसे, प्रमुख अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) श्री. अशोक मिस्री, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट संस्थेच्या श्रीमती लुबायना रंगवाला यांच्यासह विविध विशेषज्ञ, तज्ज्ञ, भागधारक आणि मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.
यावेळी संबोधित करताना मंत्री श्री. आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील पूर जोखीमसंदर्भात होत असलेली ही कार्यशाळा म्हणजे सर्वाधिक महत्त्वाची सल्लामसलत आहे. जगातील बहुतेक प्रमुख देशांना, महानगरांना वातावरण बदलामुळे अतिवृष्टी, चक्रीवादळ, पाणीटंचाई आणि इतरही नैसर्गिक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. अलीकडे मुंबई प्रदेशाजवळून चक्रीवादळे जात असल्याचा अनुभव आपण घेतला आहे. मुंबईत अतिवृष्टीमुळे आणि समुद्र सपाटीच्या तुलनेत खाली असलेल्या परिसरांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचे प्रसंग उद्भवतात. हिंदमाता, गांधी मार्केट, मीलन सबवे यासारख्या सखल भागांसह आता नरिमन पॉईंटसारख्या भागातही काही वेळा पाणी साचते. वेगवेगळ्या अभ्यासातून पुढे येणारे अहवाल आणि कामकाजावर होणारी टिका याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहून भविष्याचा विचार करणे आवश्यक आहे. वातावरण बदलामुळे मुंबईला कोणते धोके पोहोचू शकतात, तसेच पर्यावरण हा निकष समाविष्ट करून प्रकल्पांची अंमलबजावणी कशी करता येईल, यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्यासाठी विकास व शाश्वत विकास यातील अंतर प्रत्येकाने समजून घेणे गरजेचे आहे, असे श्री. ठाकरे यांनी नमूद केले
श्री. ठाकरे पुढे म्हणाले की, मुंबईत कोणताही विकास प्रकल्प राबवताना जवळपास १६ प्राधिकरणांमध्ये समन्वय साधावा लागतो आणि ४३ सेवावाहिन्यांमध्ये समन्वय साधून काम करावे लागते. त्यामुळे मुंबईत प्रकल्पांना गती देताना एकच नियोजन प्राधिकरण असणे आवश्यक आहे, जेणेकरून योग्य समन्वय होऊ शकेल. मुंबईसारख्या महानगरासाठी पुढील ५० वर्षांचा दृष्टिकोन लक्षात ठेवून नियोजन करणे गरजेचे आहे. वातावरण बदलांना सामोरे जाण्यासाठी मुंबईतील पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बेस्ट उपक्रमामध्ये इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यासह विविध बाबींचा यामध्ये समावेश आहे. भविष्यातील प्रत्येक विकास प्रकल्पामध्ये पर्यावरणाचा निकष लक्षात ठेवूनच अंमलबजावणी करावी लागेल. आपल्या शहरातील उपाययोजनांची इतर शहरांशी तुलना करून योग्य ते बदल केले पाहिजेत. सर्व राजकीय लोकप्रतिनिधींनी देखील याविषयावर संवेदनशीलता राखली पाहिजे. पर्यावरणपूरक विकास होण्यासाठी प्रत्येक महिन्याला प्रकल्पांचा त्यादृष्टिकोनाने आढावा घेतला तर आणखी चांगली मुंबई घडेल, असा आत्मविश्वास देखील श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. पी. वेलरासू यांनी सांख्यिकी तपशीलाआधारे अतिशय अभ्यासपूर्ण संगणकीय सादरीकरण केले. याप्रसंगी ते म्हणाले की, पूर जोखीम संदर्भातील या कार्यशाळेतून नामांकीत संस्थांमधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असल्याने महानगरपालिकेला अनेक गोष्टी शिकता येतील. जगातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतील लोकसंख्येची घनता दोन ते तीन पटीने जास्त आहे. समुद्रसपाटीच्या तुलनेत खाली असलेल्या परिसरांमध्ये पावसाळ्यात हमखास पाणी साचते. मुंबईतील पर्जन्यमान देखील बदलत असून एकूण सरासरीच्या ४० टक्के पाऊस हा पावसाळ्यातील दोन ते तीन दिवसात कोसळतो. मुंबईतील नाल्यांमधून समुद्रात पाणी सोडले जाणाऱया १८६ पातमुखांपैकी ४५ पातमुख हे समुद्रसपाटीपेक्षा खाली आहेत. तर १३५ पातमुख हे भरती पातळीच्या तुलनेत खाली आहेत. याचाच अर्थ केवळ सहा पातमुख हे उंचावर आहेत. मुंबईची सखल भौगोलिक रचना, जगभरातील वातावरण बदल, अतिवृष्टी या घटनांवर मानवी नियंत्रण नसले तरी वेगवेगळ्या उपाययोजना केल्याने पावसाळ्यात पाणी साचून राहण्याचा कालावधी पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. महानगरपालिकेने सहा पर्जन्य जलउदंचन केंद्रं बांधली आहेत. त्यातून ७० हजार दशलक्ष लीटर प्रतिदिन पाणीउपसा करण्याची क्षमता आहे. मुंबईतील ३८६ पैकी २८० ठिकाणी पूरप्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत. दरवर्षी नाल्यांमधून मोठ्या प्रमाणावर गाळ काढला जातो. या सर्व उपाययोजना होत असल्या तरी दीर्घकालीन स्वरूपाच्या उपाययोजना करण्यासाठी याप्रकारच्या कार्यशाळा उपयुक्त आहेत. धोरणात्मक बदलांसोबत आता कायद्यांची कठोर अंमलबजावणी देखील करावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
जसंवि/०४६

0 टिप्पण्या