पोलिस आयुक्तांच्या बैठकीत निर्णय
मुंबई : रेल्वे स्टेशन परिसरात १५० मीटर पर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असतानाही फेरीवाले कोणाला जुमानत नव्हते. अखेर फेरीवाले हटविण्यासाठी पालिका, रेल्वे आणि पोलिसांकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
मंगळवारी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या उपस्थितीत पोलिस मुख्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटर आणि शाळेपासून १०० मीटरच्या अंतरावर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे. मात्र, हा आदेश धुडकावून फेरीवाले रेल्वे परिसरातील पदपथ, स्कायवॉक, पादचारी पुलावर सर्रास व्यवसाय करीत आहेत. त्याचा फटका पादचारी आणि प्रवाशांना बसत असून स्टेशन परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे. रेल्वे परिसरातील कारवाई ही रेल्वे प्रशासनामार्फत केली जाते. मात्र, अपुऱ्या यंत्रणेमुळे गेल्या दोन वर्षांपासून ही कारवाई थंडावली आहे. त्यामुळे फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मंगळवारी मुंबई फेरीवाला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी सुमारे ५० प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
पोलिसांच्या मदतीने स्टेशन परिसर मोकळा ठेवण्यासाठी तात्काळ कारवाई सुरू करण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांनी या बैठकीत दिले आहेत. पालिका आपल्या हद्दीतील कारवाई कायम ठेवणार असल्याचे पालिकेचे उपायुक्त चंदन जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. कारवाईसाठी वाहतूक पोलीस व फेरीवाला संघटनांचे सहकार्य घेण्यात येईल. फेरीवाल्यांचे स्टॉल परवाना विभागाने ठरवून दिलेल्या आकारानुसार आहे तिथेच ठेवावेत अशी विनंती वाहतूक पोलिसांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा