कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्थेसह आवश्यक ती खबरदारी
अनुयायांनी घरी राहूनच जयंती साजरी करण्याचे आवाहन
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पूर्वतयारीची अतिरिक्त आयुक्त श्री. जयस्वाल यांनी केली पाहणी
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिन (दिनांक १४ एप्रिल) निमित्ताने दादर येथील चैत्यभूमी स्मारक येथे करण्यात येत असलेल्या पूर्व तयारीची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल यांनी आज (दिनांक ९ एप्रिल २०२१) पाहणी केली. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा विशेष व्यवस्थेसह आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. अनुयायांनी यंदा घरी राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन श्री. संजीव जयस्वाल यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी म्हणजे प्रतिवर्षी १४ एप्रिल रोजी चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. त्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर वेगवेगळ्या सुविधांची कामे हाती घेतली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने पुष्ट सजावट, रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, दिवाबत्ती यांचा समावेश असतो. यंदाच्या १३० व्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व कामे सध्या सुरु आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल यांनी या कामांची पाहणी करुन आढावा घेतला. तसेच आवश्यक ते निर्देशही दिले.
कोरोना विषाणू संसर्गाचा पुन्हा वाढलेला धोका पाहता राज्य शासनासह बृहन्मुंबई महानगरपालिका देखील सतर्क व सज्ज आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही जयंती दिनी चैत्यभूमी येथे शासकीय मानवंदना व इतर सर्व कार्यवाही करण्यात येणार आहे. तथापि, कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्वांचे पालन करता यावे, कोरोनाचा प्रसार होवू नये म्हणून एकत्र येण्यावर असलेल्या निर्बंधांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे.
चैत्यभूमी येथे दर्शनासाठी येणाऱया अनुयायांची चाचणी करण्यात येणार आहे. तसेच निर्जंतुकीकरण, तपासणी आदी कोविड प्रतिबंधात्मक खबरदारी देखील घेण्यात येणार आहे.
यंदा शासकीय मानवंदना कार्यक्रमाचे ऑनलाईन व प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, जेणेकरुन अनुयायांसह सर्वांना आपापल्या घरी राहून, स्थानिक स्तरावरुन अभिवादन करता येईल. प्रत्यक्ष चैत्यभूमी येथे न येता, अनुयायांना अभिवादन करणे शक्य व्हावे म्हणून थेट प्रक्षेपणाची ही विशेष सोय करण्यात येत आहे. त्याचीही माहिती श्री. जयस्वाल यांनी यावेळी जाणून घेतली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, उप जिल्हाधिकारी श्री. कल्याण पांढरे, उपआयुक्त (परिमंडळ २) श्री. विजय बालमवार, पोलीस उप आयुक्त श्री. प्रणय अशोक, जी/उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. किरण दिघावकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिर्वाण दिन समन्वय समितीचे श्री. महेंद्र साळवे, श्री. नागसेन कांबळे व भारतीय बौद्ध महासभेचे श्री. प्रदीप कांबळे हे यावेळी उपस्थित होते.
===
(संदर्भ क्रमांक: जसंवि/०२१)
0 टिप्पण्या