महापालिका क्षेत्रात कोव्हीड काळात १ कोटी ७८ लक्षहून अधिक दंडात्मक वसूली
नवी मुंबई : दैनंदिन रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोव्हीड प्रतिबंधासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसींग व कन्टेनमेंट झोनचे सुयोग्य व्यवस्थापन करण्यासोबतच विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामध्ये मिशन ब्रेक द चेन ची अंमलबजावणी करताना बेड्स सह रुग्णालयीन सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात येत आहे.
त्यासोबतच नागरिकांमध्ये मास्क वापराचे गांभीर्य यावे याकरिता विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. त्यासोबतच जे बेजबाबदार नागरिक मास्क न वापरता इतरही कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन करुन सामाजिक आरोग्याला धोका पोहचवित आहेत त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
याकरिता प्रत्येक वॉर्डमध्ये नियुक्त पोलीसांसह दक्षता पथकांव्यतिरिक्त १५५ कर्मचा-यांची ३१ विशेष दक्षता पथके तैनात करण्यात आलेली आहेत. ५ एप्रिलपासून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार राज्याप्रमाणेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातही ब्रेक द चेन अंतर्गत काही बाबींवर निर्बंध सुरु करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीवर विशेष दक्षता पथकांमार्फत लक्ष ठेवले जात आहे.
२० मार्चपासून कार्यान्वित झालेल्या या दक्षता पथकांमार्फत आत्तापर्यंत एकूण ३९ लक्ष ८ हजार ६०० इतकी दंडात्मक रक्कम ६ हजार ७७४ व्यक्ती / आस्थापना यांच्याकडून कोव्हीड सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी वसूल करण्यात आलेली आहे. यामध्ये मास्क न वापरणा-या २५०७ व्यक्तींकडून ११ लक्ष ३८ हजार, सोशल डिस्टंसींगचे उल्लंघन झालेल्या २१२ दुकानदारांकडून १९ लक्ष १७ हजार २०० व सोशल डिस्टंसींगचे उल्लंघन करणा-या ४२६० व्यक्तींकडून ८ लक्ष ५१ हजार ८०० तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या १६ व्यक्तींकडून १६ हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
०८ एप्रिल रोजी मास्क न वापरणा-या ११६ व्यक्तींकडून ५८ हजार, सोशल डिस्टंसींग न राखणा-या ९ दुकानदारांकडून १९ हजार २००, सोशल डिस्टंसींगचे उल्लंघन करणा-या १६१ व्यक्तींकडून ३२ हजार २०० अशाप्रकारे २८६ व्यक्ती / दुकानदारांकडून १ लक्ष १२ हजार ४०० इतकी दंडात्मक रक्कम एका दिवसात वसूल करण्यात आलेली आहे.
१० ऑगस्टपासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड नियमांचे उल्लंघन करणा-या ३७८२८ नागरिक / दुकानदारांकडून एकूण १ कोटी ७८ लक्ष १५ हजार ९०० इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.
कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांमध्ये मास्क, सुरक्षित अंतर व सतत हात धुणे या कोरोनापासून बचावाची त्रिसुत्री पालन करण्याचे गांभीर्य वाढावे यादृष्टीने या त्रिसुत्रीचे उल्लंघन करून स्वत:सह सामाजिक आरोग्याला धोका पोहचविणा-या बेजबाबदार नागरिकांना समज यावी याकरिता दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तरी नागरिकांनी जबाबदारीचे भान राखून कोव्हीडची साखळी खंडीत करण्यासाठी कोव्हीड त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करून कायम सतर्क रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्यावतीने करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या