वयोगटानुसार रांगा लावण्याची मागणी
मुंबई, दादासाहेब येंधे : कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुंबईतील अनेक केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर १ मे पासून लसीकरण करताना सर्व नागरिकांना एकाच रांगेत न उभे करता १) ४५ वर्षांवरील म्हणजेच ज्यांनी एकही डोस घेतला नाही अशा नागरिकांची एक रांग २) १८ वर्षावरील नागरिकांची एक रांग व ३) ज्यांनी पूर्वी डोस घेतला आहे व आता दुसरा डोस घेऊ इच्छितात अशा नागरिकांची तिसरी रांग. अशा स्वतंत्र तीन रांगा बनविण्यात याव्यात जेणेकरुन जेष्ठ नागरिकांना जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नाही व रुग्णालयांच्या / लसीकरण केंद्राच्या यंत्रणेवर ताण येणार नाही अशी मागणी जीवनप्रबोधिनी ट्रस्ट चे संस्थापक सत्यवान नर , अध्यक्ष - अमित पवार , सरचिटणीस -हेमंत मकवाना आणि सतीश कार्लेकर यांनी महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे ) तसेच के.ई. एम., नायर व कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली.
रोज कोरोना लस घेण्यासाठी दररोज नागरिकांची मोठी गर्दी होत असून लस घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या जेष्ठ नागरिकांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. तसेच या रांगांमध्ये सोशल डिस्टन्स चा फज्जा उडताना दिसत आहे व त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता आहे. लस घेण्यासाठी जाणाऱ्या लोकांना मात्र वेळेवर लस उपलब्ध होत नसल्याचेही दिसून येत आहे. अनेकवेळा लस संपल्यामुळे रांगेत उभ्या राहिलेल्या लोकांना लस न टोचताच परत यावे लागले आहे त्यामुळे लोकांचे खुप हाल होत आहेत. शिवाय केंद्र सरकारने १ मे २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणास परवानगी दिली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ताण आरोग्य यंत्रणांवर येऊन मोठे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे लसीकरण करताना योग्य नियोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा