मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी महानगरपालिका कामकाजाची घेतली माहिती - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०२२

मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी महानगरपालिका कामकाजाची घेतली माहिती

मुंबई, दि. ४: राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक ३ ऑक्टोबर २०२२) बैठक घेवून महानगरपालिकेच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली तसेच सध्या प्रगतिपथावर असलेल्या योजनांचा आढावा देखील घेतला.


महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, आमदार कॅप्टन तमिल सेल्वन, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्री. आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, सहआयुक्त (दक्षता) श्री. अजीत कुंभार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त व इतर खातेप्रमुख याप्रसंगी उपस्थित होते.


मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबई महानगराची पालक संस्था असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेता यावी, सध्या सुरु असलेले प्रकल्प व योजना यांचा आढावा घेता यावा आणि भविष्यातील दिशा यादृष्टीने पालकमंत्री श्री. केसरकर यांनी महानगरपालिका मुख्यालयात ही बैठक बोलावली होती.


प्रारंभी, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी महानगरपालिकेची संक्षिप्त ओळख करुन दिली. त्यानंतर सर्व अतिरिक्त आयुक्तांनी क्रमाक्रमाने संगणकीय सादरीकरण करुन कामकाजाची माहिती पालकमंत्र्यांना करुन दिली.


सादरीकरण व माहिती जाणून घेतल्यानंतर श्री. केसरकर म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईकरांना नागरी सेवा-सुविधा पुरवतेच. महानगरपालिका प्रशासनात अनुभवी व तज्ज्ञ मनुष्यबळ आहे, त्याचप्रमाणे मुंबईतही कौशल्याची कमतरता नाही. या सर्वांची सांगड घालून मुंबई महानगराच्या विकासासाठी जे-जे नावीण्यपूर्ण, आधुनिक व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य नागरिकांच्या कल्याणाशी जोडलेले उपक्रम राबवता येतील, ते हाती घेण्याचा मानस आहे. अरुंद व दाटीवाटीच्या वस्तींमध्ये राहणारे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, इतर वंचित घटक या सर्वांना मुंबई महानगरामध्ये योग्य स्थान मिळावे म्हणून शिक्षण, रोजगार निर्मिती, आरोग्य या क्षेत्रांसह इतरही आवश्यक त्या सर्व  क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ होण्यासाठी महानगरपालिका व राज्य शासन यांच्यामध्ये दुवा म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीन, असेही पालकमंत्री श्री. केसरकर यांनी नमूद केले.   




जसंवि/२६६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज