बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पदपथांची सुधारणा आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी महानगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतलेल्या चार पैकी वडाळा आणि चेंबूर या दोन ठिकाणच्या प्रकल्पांचे भूमिपूजन राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच (दिनांक ६ डिसेंबर २०२१) करण्यात आले.
याप्रसंगी खासदार श्री. राहुल शेवाळे, आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर, आमदार श्री. तुकाराम काते, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, नगरसेवक श्री. अमेय घोले, उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. हर्षद काळे, उप आयुक्त (परिमंडळ ५) श्री. विश्वास शंकरवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. राजन तळकर, एम/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त श्री. विश्वास मोटे, एफ/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. गजानन बेल्लाळे, रस्ते विभागाचे इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे अशा तिन्ही विभागांमधील पदपथांची नावीन्यपूर्ण पद्धतीने, नागरी विकासाच्या आधुनिक मापदंडाना अनुसरून आणि महानगराच्या सौंदर्यात भर होईल, अशा रीतीने बांधणी, सुधारणा व सुशोभीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पादचाऱयांना चालण्यासाठी सुलभतेला आणि त्यांच्या सुरक्षिततेला लक्षात ठेवून नवीन पदपथ संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. प्रारंभी चार ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर हे काम केले जाणार आहे. यामध्ये एफ/उत्तर विभागात लेडी जहांगीर रस्त्यावरील पदपथ (रुईया महाविद्यालय ते वडाळा रेल्वे स्थानक), एम/पश्चिम विभागातील चेंबूरमध्ये दयानंद सरस्वती मार्ग ते डायमंड गार्डन पर्यंत, एच/ पूर्व विभागातील वांद्रे (पूर्व) मध्ये अली यावर जंग मार्ग आणि एस. डी. मंदिर मार्ग, पी/दक्षिण विभागातील गोरेगाव मध्ये एम. जी. मार्ग या ठिकाणी नावीन्यपूर्ण पदपथ बांधले जाणार आहेत. यापैकी चेंबूर आणि वडाळा येथील पदपथ सुशोभीकरणाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या नवीन पदपथांची संकल्पना ही बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पादचाऱयांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कारण या आधुनिक पदपथांवर चालण्याची क्षमता वाढीस लागणार असल्याने नागरिकांना सुखकर अनुभव येईल. पदपथांची भौतिक स्थिती सुधारून, पदपथांसह रस्त्यांचे सौंदर्य देखील यात वाढेल. पदपथ आणि नागरी विकासाच्या आधुनिक संकल्पना व मार्गदर्शक तत्त्वांचा यामध्ये समावेश करून अंमलबजावणी केली जाणार आहे. सुमारे ४० ते ५० वर्ष टिकतील आणि कमीत कमी खर्चामध्ये परिरक्षण करावे लागेल, अशा पद्धतीचे हे पदपथ राहणार आहेत.
पदपथांचा पृष्ठभाग समतल राखणे, रस्ता ओलांडणे सुलभ होणे, प्रमाणबद्ध आणि सर्वसमावेशक असे सूचना फलक लावून पादचाऱयांना योग्य मार्गदर्शन करणे, विद्यमान पथदिव्यांमध्ये आधुनिकता आणून पदपथांचे सौंदर्य वाढवणे, आधुनिक पद्धतीने बनवलेले बाक, कचरापेटी, फुलझाडे इत्यादी लावणे, पदपथावरील वृक्षांच्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या सभोवताली वृक्ष संरक्षण उपाययोजना करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व सुशोभीकरणाला अनुरूप असे प्रभावी आणि आधुनिक बस थांबे उभारणे या सर्व बाबींचा या कामांमध्ये समावेश आहे.
या प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे पंधरा महिने इतका आहे. टप्प्या-टप्प्याने हे काम हाती घेतले जाणार आहे, जेणेकरून संबंधित परिसरातील पादचाऱयांना आणि रहिवाशांना कोणतीही अडचण होणार नाही.
(जसंवि/४६५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा