मुंबई, दि. २७ : वडाळा येथील संगम नगर परिसरात राहणारे पाच वर्षांचे मावसभाऊ बहीण गुरुवारी संध्याकाळी घरातून बाहेर पडले आणि भरकटले. तेथील भाजी मार्केटमध्ये गेल्यानंतर कुठे जायचे हे त्यांना समजत नव्हते. दरम्यान मुलं घरी दिसत नसल्यामुळे त्यांचे आजी आजोबा घाबरून गेले आणि त्यांनी लगेच वडाळा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. वडाळा पोलिसांनी देखील तात्काळ शोधमोहीम हाती घेत दोघांना दीड तासात शोधून काढले.
संगम नगर मधील शिव मंदिराजवळ ही दोन्ही बालके त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. गुरुवारी संध्याकाळी पाच वर्षांचा मुलगा खेळत होता. तर त्याची मावस बहीण झोपलेली होती. तिला जाग आल्यावर आजूबाजूला आई नसल्याने ती चिलबिचन झाली. ती पोट माळ्यावरुन खाली उतरली आणि आईला शोधू लागले. तिच्या पाठोपाठ तिचा भाऊ देखील गेला. दोघेही संगमनगर येथील भाजी मार्केटमध्ये गेले आणि भरकटले. दरम्यान दोन्ही मुलं घरी नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांचे अजून आजोबा घाबरून गेले. मुलं आजूबाजूला दिसत नसल्याने त्यांनी लगेच वडाळा पोलीस स्टेशन गाठले आणि मुलं हरवल्याची तक्रार दिली. या तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सविता वाहुळे व उपनिरीक्षक प्रशांत रणवरे तसेच कदम, काटे व पथकाने तपास सुरू केला. पोलिसांची चार पथके बनवून सीसीटीव्ही फुटेज तपासणी, आजूबाजूच्या पोलीस ठाण्याशी संपर्क करून माहिती घेणे, तसेच पायी गस्त घालून शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा ती दोन्ही बालके संगमनगर येथील एका मशिदीजवळ बसलेली मिळून आली. मुलांना बघून त्यांच्या पालकांनी सुटकेचा नि: श्वास सोडला. पोलिसांनी तात्काळ पथके तयार करून शोध घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

0 टिप्पण्या